६ लाख ४७ हजार ८७८ मे. टन ऊस गाळपातून ७ लाख ८३ हजार साखर पोत्यांचे उत्पादन
बिद्री ता. २४ ( प्रतिनिधी ) : येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ६२ व्या गळीत हंगामाची नुकतीच सांगता झाली. हंगामाच्या समाप्तीनिमित्त श्री. संदिप पाटील व त्यांच्या पत्नी, कारखाना संचालिका सौ. क्रांती उर्फ अरुंधती पाटील यांच्या हस्ते सत्यनारायण पुजा आयोजित केली होती. कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यंदाच्या गळीत हंगामात कारखान्याने ९५ दिवसांमध्ये ६ लाख ४७ हजार ८७८ मे. टन ऊसाचे गाळप केले असून ७ लाख ८३ हजार साखर पोती उत्पादित केली आहेत. आजअखेर सरासरी साखर उतारा १२.६२ टक्के राहिला आहे. कारखान्याचा सहवीज प्रकल्प पुर्ण क्षमतेने सुरु असून आजअखेर ९७ दिवसांमध्ये प्रकल्पातून ५ कोटी, ७९ लाख १३ हजार २०० युनिट वीजनिर्मिती झाली आहे. त्यापैकी कारखाना वापर वगळता ३ कोटी ८९ लाख ०८ हजार ९०० युनिट वीज महावितरणला निर्यात केली केली असून सहवीज प्रकल्प एप्रिल अखेरपर्यंत चालणार आहे.
कारखान्याच्या ६० केएलपीडी क्षमतेच्या डिस्टिलरी व इथेनॉल निर्मिती प्रकाल्पातून पुर्ण क्षमतेने निर्मिती सुरु असून आजवर प्रकल्पातून ९१ दिवसात ५ लाख २४ हजार रेक्टिफाईड स्पिरीट व इथेनॉल ५६ लाख २३ हजार ४१८ लिटर उत्पादित झाले असून डिस्टिलरी प्रकल्प मे अखेर पर्यंत चालणार आहे. कारखान्याकडे गळीतास आलेल्या ऊसाचे १५ जानेवारी अखेरची ऊसबिले सभासदांच्या खात्यावर वर्ग केली आहेत.
स्वागत कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी केले. कार्यक्रमास संचालक सुनिलराज सुर्यवंशी, राजेंद्र पाटील, के. ना. पाटील, आर. व्हि. पाटील, संभाजीराव पाटील, फिरोजखान पाटील, दीपक किल्लेदार, फत्तेसिंह भोसले, आर. एस. कांबळे, सौ. रंजना पाटील, आप्पासो पाटील, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, शेती अधिकारी बी. एन. पाटील, अशोक फराकटे यांच्यासह खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
